बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

सचिन देव बर्मन


"म हा न" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव उर्फ एस.डी. उर्फ "दादा" बर्मन यांचा आज ३७ वा स्मृतीदिन !

दादा बर्मन सर्वार्थाने दादाच होते. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ऒर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणार्या ईतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि रुबाब होता. सर्व जिनीयस लोकांचा असतो तसा एक प्रकारचा उर्मट, आढ्यताखोर आणि विक्षीप्तपणाही त्यांच्या वागण्यात होता. पण या सर्व अवगुणांवर त्यांच्या संगीतातल्या विविधतेने मात केली. आणि रसीकांना कायम मोहात पाडेल असे संगीत त्यांनी दिलं. एकाच चित्रपटात नायक/नायीकांसाठी त्यांनी बिनदिक्कत पणे वेगवेगळ्या गायकांचा वापर केला आणि तो यसस्वी ही करून दाखवला. त्यांच्या चित्रपटातला देव आनंद एकाच चित्रपटामधे कधी किशोरच्या तर कधी रफी, हेमंतकुमार, तलत यांच्या आवाजात गायचा आणि विशेष म्हणजे त्या त्या ठिकाणी तोच आवाज योग्य वाटायचा. गायकांप्रमाणे त्यांच्या गाण्यातल्या वाद्यांची निवडही अचूक असायची. स्वत: गायक असले तरी आपला आवाज त्यांनी कधीही कुठल्या नायकाला किंवा सहकलाकाराला दिला नाही. त्यांनी गायलेली गाणी ही कायम पार्श्वभुमीवर वाजायची आणि त्या त्या चित्रपटातल्या कथेचा एक हिस्सा बनायची. उदा. "गाईड" मधले "वहॊं कौन है तेरा, मुसाफीर जायेगा कहॊं" असो किंवा "सुजाता" मधलं "सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा" असो, ही गाणी म्हणजे त्या चित्रपटाच्या कथेचाच एक भाग होती.

बर्मनदांची आणखी एक देणगी म्हणजे "देवाचं सर्वात लाडकं बाळ" असलेल्या किशोर कुमारच्या आवाजाचा त्यांनी केलेला वापर. "आराधना" मुळे किशोर जरी गायक म्हणून घोडदौड करू लागला असला तरी या आराधनापुर्वी किशोरच्या आवाजातली अनेक अजरामर गीते ही बर्मनदांनीच दिली आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं काही काळ लता आणि नंतर रफीशी पटत नव्हतं. पण किशोरच्या बाबतीत ही गोष्ट कधीच घडली नाही. एखाद्या गायकाने गायलेले गाणे जर त्यांच्या मर्जीस आले नाही तर ते उघडपणे चारचौघात त्या गायकाला ही गोष्ट सुनवीत असत. "सुजाता" मधलंच तलतचं "जलते है जिसके लिए" हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक रिर्हसल करूनही शेवटपर्य़ंत तलतला हे गाणं जसं बर्मनदांना अभिप्रेत होतं तसं गाता आलं नव्हतं. शेवटी दिग्दर्शक बिमल रॊय यांनी रदबदली करून हा वाद मिटवला. विशेष म्हणजे संगीतकाराला शेवटपर्यंत न रुचलेलं हे गाणं तलतच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमधलं एक आहे.

किशोरप्रमाणेच (आराधना) मन्ना डे च्या उत्कर्षाला देखील बर्मनदाच जबाबदार आहेत. आधी काही पौराणीक चित्रपटांची गाणी गाऊन आणि अपयशी ठरून कलकत्त्याला परत जाण्याच्या विचारात असलेल्या मन्नादांना त्यांचं पहिलं लोकप्रिय गीत - उपर गगन विशाल - हे बर्मनदांनीच दिलं. या गाण्याचं वैशीष्ट्य म्हणजे हे गाणं आधी बर्मनदांच्या आवाजात रेकॊर्ड होऊन त्याचं चित्रीकरणही झालं होतं. पण त्याच सुमाराला बर्मनदांचं निर्माता अशोक कुमारशी (चित्रपट - मशाल) बिनसलं. पण व्यावसायिक करारामुळे बर्मनदांनी चित्रपटाला संगीत तर दिलं पण आपला आवाज वापरायला नकार दिला आणि हे गाणं मन्नादां कडे आलं.

शंकर-जयकिशनचा प्रचारक असलेला माझा मित्र बाकी सर्व संगीतकारांची उणी-दुणी काढायचा, त्यांच्या त्रुटी दाखवायचा पण बर्मनदांचा विषय काढला की फक्त "दादा बर्मन - मोठा माणूस" एवढंच बोलून कानाच्या पाळ्यांना हात लावायचा.

बर्मनदांचा विषय काढला की "ज्वेल थिफ" मधलं "होठोंमे ऐसी बात" हे गाणं माझ्या मनात आधी येतं. भारतात वापरल्या जाणार्या जवळपास सर्वच तालवाद्यांचा वापर या गाण्यात आहे. हे गाणं ऐकताना मला नेह्मी एकच विचार मनात येतो की एवढ्या सगळ्या वाद्यांचा वापर करताना या रचनेचा आकृतीबंध (व्हिज्युअलायजेशन) त्यांच्या डोक्यात कसा आला असेल. जेव्हा मेलडी बनवली जाते किंवा स्वरवाद्यांचा वापर गाण्यांमधे केला जातो तेव्हा प्रत्येक वादकाला त्याची त्याची नोटेशन्स दिलेली असतात. तालवाद्यांमधेही हे करता येतं पण हे काम खरंच जिकीरीचं आहे. कारण टायमींग हा त्यातला सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. एखाद्या ठेक्याच्या बाबतीत हे करणं शक्य आहे पण एकाच गाण्यामधे वापरलेल्या किमान पंधरा वेगवेगळ्या जातकुळीच्या तालवाद्यांबाबत हे करण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी जिनीयसचं हवा.

बर्मनदांच्या याच गाण्याला (होठोंमे ऐसी बात मै दबाके चली आयी - ज्वेलथिफ) शेअर करून मी या सार्वकालिक महान संगीतकाराला आदरांजली वाहतो !


http://www.youtube.com/watch?v=jtn4am42kW4

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो


सध्या ऒफीसमधे खरंतर प्रचंड काम आहे. ईतकं की घरी आलो की अक्षरश: थकून पडून जाईन की काय असं वाटतं. तरीही आतून एक प्रकारचं रिकामपण आहे. काय काय संकल्प ठरवले होते पण एकही सुरू झाला नाही. जिवनाचे सुत्र हे कुठल्याही रिळाला गुंडाळले नसून नुसता सुतड्याचा गुंडाळा झाला आहे. मला साहीर पावलो-पावली भेटतो असं मला नेहमी वाटतं. तसाच काहीसा अनुभव आता मला संदीप खरेच्या बाबतीत येतो आहे. कारण माझ्या मनाची ही अवस्था अगदी जशीच्या तशी मला त्याच्या कवितेत सापडली.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे
उत्तर कुठले, मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी, नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कसल्या दिलखुष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पुर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या ईवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

साहीर लुधीयानवी

माझा सर्वाधिक आवडता गीतकार/कवी साहीर लुधीयानवी याचा आज ३२ वा स्मृतीदिन ! त्या निमित्ताने या महान कवीला आदरांजली ! साहीर कोण होता हे शब्दात वर्णन करणे कठिण आहे. जिवनाच्या हरएक प्रसंगाला अनुरूप असं एकतरी साहीर चं गाणं आहे. त्यामुळे मला तर तो पावला-पावलाला भेटलाय. "तारूफ रोग बन जाए तो उसको भुलना बेहतर, ताल्लूक बोझ बन जाए तो उसको छोडना अच्छा" असं म्हणणारा साहीर कळला पण वळला मात्र अजूनही नाही. त्यामुळे अशा कित्येक ताल्लूकांचा बोझ घेऊन दिवस ढकलतोच आहे. कधी कधी एखाद्या माहीतीच्या पण आपला संबंध नसलेल्या व्यक्तीचं मरण आपल्या डोळ्यात पाणी आणून जातं. यावर साहीर चटकन म्ह्णून जातो - "कौन रोता है किसी और की खातीर ऐ दोस्त, सबको अपनीही किसी बात पे रोना आया". समाजवादाचा एक वेगळाच अर्थ साहीरने कुठलाही आव न आणता सहजपणे समजाऊन दिला. साहीर विषयी जितकं लिहू तितकं कमीच आहे. फार पुर्वी मला साहीरच्या गाण्यांचा मला उमगलेला अर्थ लिहून ठेवायची सवय होती. त्यातल्याच एका "चित्रलेखा" मधल्या गाण्याबद्दल मी लिहीलेले चार शब्द ईथे परत उधृत करतोय.
*************************************************************
संसार से भागे फिरते हो

काल आपली होळी-धुळवड झाली. पण राजकारणातल्या धुळवडीला नुकती कुठे सुरुवात झाली आहे. हळुहळू एकेक रंग आणि ढंग बाहेर येतील. चिखलफेक सुरु असतेच, तिला आणखी जोर येईल. एकीकडे जागतिक मंदीच्या भोवर्‍यात सापडलेले आम्ही आणि दुसरीकडे अक्कल सोडुन दुसरी कुठलीही मंदी माहीत नसलेले राजकारणी. आदीमानवाच्या काळात देखील काढले गेले नसतील ईतके माणसाच्या संस्कृतीचे वाभाडे आता काढले जातील आणि तेही so called Self-declared संस्कृती-रक्षकांकडुन. मन विषण्ण करणार्‍या या परिस्थितीत आधार देतात ती काही गाणी. डोकं सुन्न झालयं, कुठलाही विचार मनामध्ये येत नाहीयें. डोळ्यांना दिसतयं पण जे दिसतयं त्याचं आकलन होण्यासाठी लागणारी विचार्-बुद्धी गमावुन बसलो आहे. आणि अशा निष्काम अवस्थेमध्ये गाणं कानावर आलं...

संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे
ईस लोक को तो अपना ना सके, उस लोक में भी पछताओगे

साहीर लुधीयानवी. साहीर समाजवादी होता. म्हणजे नक्की काय होता. मी लहानपणा पासुन संघ-विचारात वाढलेला. घरी-दारी संघाचे विचार. संघाचे असे विचार - जे डॉक्टरांना अजिबात अभिप्रेत नव्हते. हे मला नंतर डॉक्टरांचे चरित्र वाचल्यानंतर उमगले. समाजवाद - ही एक शिवी असल्यासारखे त्याचे उच्चारण. कालांतराने समाजवादी पार्टी आणि तीचे नेते यांनी आपल्या वर्तनाने "समाजवाद" ही खरोखरच एक शिवी बनवली. पण डॉ. राम मनोहर लोहीया यांना अभिप्रेत असलेला समाजवाद हा वेगळा होता. आणि साहीर पक्का लोहीयावादी. मला अजुनही"माझ्या आजुबाजुच्या काही "थोर" मंडळीच्या चर्चा आठवतात. जे जे उत्तम (म्हणजे आमच्या बाल-बुद्धीला आवडलेलं, भावलेलं) ते सर्व साहित्य किती बोगस, फालतु आहे हे आमच्या मनावर ठसविण्याची जणु अहमहमिकाच लागलेली असे. पु.लं. - समाजवादी, कुसुमाग्रज - समाजवादी, पाडगावकर - समाजवादी अशी सगळी जंत्री होती. "या लोकांनी फक्त समाज सुधारण्याच्या गप्पा माराव्यात. खरी काठ्या खाण्याची वेळ येते ना तेव्हा आम्हीच असतो. हे xx समाजवादी xxला पाय लावून पळत सुटतात" अशी मुक्ताफळं सतत कानावर येत. एकीकडे मी पु.लं. चा हरीतात्या वाचत असायचो, रावसाहेब वाचत असायचो. वाचता वाचता त्या व्यक्ती आणि वल्ली माझ्या डोळ्यासमोर मुर्तीमंत उभ्या असायच्या. कुसुमाग्रजांची "कणा" वाचुन कुठेतरी अंगावर काटा उभा राहीलेला असायचा. "वेडात मराठे विर दौडले सात" वाचुन (आणि नंतर ऐकुन) मुठी वळत असायच्या. पाडगावकरांची "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" वाचुन आयुष्यातले छोटे छोटे आनंद पण कसे उपभोगावे याची मनातल्या मनात प्रॅक्टीस करत असायचो. आणि त्याचवेळी हे सगळे आनंद ज्यांनी मिळवून दिले त्या जनकांबद्दल असे कटु उद्गार स्वतःच्या नाही पण मित्रांच्या जनकांकडून ऐकावे लागायचे. चिमुकल्या डोक्यात परस्परविरोधी विचारांचे रणकंदन माजलेले असायचे. एकीकडे आईचे उपास-तापास, व्रत-वैकल्य चालू असायची. हिंदु धर्म आणि त्याचे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, त्या धर्मातला माझा विशिष्ट भाषा बोलणारा समाज, त्या समाजाचे स्वत:चे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, त्या समाजातली माझी जात आणि त्या जातीचे स्वत:चे कायदे, शिष्टाचार, चाली-रिती, आणि मी - एक माणुस. माझी स्वतःची एक जिवन-पद्धती, स्वतःचे काही नियम. किती आणि काय म्हणुन भान ठेवायचे ?

यह पाप है क्या, ये पुण्य है क्या, रितोंपर धर्म की मोहरें है
हर युग में बदलतें धर्मोंको, कैसे आदर्श बनाओगे

सत्ययुगात म्हणजे श्रीरामाच्या युगातला धर्म, जो आपण आज खरा हिंदु धर्म मानतो त्याला श्रीकृष्णाच्या द्वापारयुगात कितीसं महत्व होतं ? स्वतः श्रीकृष्णाने क्षत्रिय कुलात जन्म घेतला, यादव कुलात त्याचं पालन-पोषण झालं हे सर्वांना माहित असलेलं सत्य असताना यज्ञाला बसताना "मी ब्राह्मण आहे" असे सांगीतले. अर्जुनाला उपदेश करताना धर्माचा खरा अर्थ समजावला. त्या भगवतगितेला आज आपण आपला धर्मग्रंथ मानतो. असा हा युगपरत्वे बदलणारा धर्म. मग या कलीयुगातच त्या धर्माचं एवढं अवडंबर का ? माझ्या मनाला पटलेल्या मार्गाने जगायला अडथळा करणारी माणसं नक्की कोणत्या धर्माचं पालन करतात ? मुळात त्यांना ही धर्मपालनाची ठेकेदारी दिलीच कुणी ? आणि जर ते स्वयंघोषीत ठेकेदार आहेत तर मग त्यांना त्यांची जागा दाखवणारे शासन आम्हाला का मिळत नाही ? मुळात देव ही एक कल्पना आहे. प्रत्येकाला त्याच्या देवाचा साक्षात्कार वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो हे का मान्य केले जात नाही ?

यह भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे

एका गाण्याच्या स्पर्धेला मी श्रोता म्हणून गेलो होतो. मध्यंतरात मी स्पर्धकांना भेटण्यासाठी म्हणुन त्यांच्या खोलीत गेलो. बरेचसे स्पर्धक - ज्यांची गाणी गाउन झाली होती - ते निकालाच्या चिंतेने चिंतातुर चेहर्‍याने बसले होते. त्यातल्या काहींशी मी बोललो. त्यांना " छान झालं हा गाणं" अश्या प्रोत्साहनपर कॉम्प्लीमेंटस दिल्या. त्यांनीही हसुन आभार मानले. त्यातच एक जण होता, तो चटकन म्हणाला " तुम्हाला माहीती तरी आहे का मी कोणतं गाणं म्हटलं ते ?" मी म्हटलं "हो. आणि हे ही माहिती आहे की ही स्पर्धा आयत्या वेळेस गाणे म्हणण्याची असूनही वादकांनी फक्त तुमच्याच गाण्याला अतिशय सुरेख साथ केली होती." त्यावर तो म्हणाला " नाही, काही लोकांना सवय असते तोंडावर गोड बोलायची. देखल्या देवा दंडवत असा प्रकार असतो. म्हणून म्हटलं" मला त्याच्या बोलण्याचा राग आला नाही, वैषम्य वाटलं. ज्या माणसाची आपली यापुर्वी ओळखदेख नाही, यापुढेही ज्याचा आपला काही संबंध येण्याची शक्यता नाही. ज्याला आपल्याशी चांगलं बोलल्याने काहीही फायदा होणार नाही असा माणूस जर आपल्याला चांगलं बोलत असेल तर आपल्या मनात संशय का निर्माण व्हावा. शहरामध्ये येणारे परदेशी पाहुणे कधी कधी अकारण आपल्याकडे बघुन "स्माईल" देतात. त्यात आपल्यालाही काही गैर वाटत नाही. याउलट ट्रेनमध्ये आपल्या समोरच्या बाकावर बसलेला आपला (अनोळखी) भारतीय बाधव आपल्याकडे बघुन हसला तर आपली पहीली प्रतिक्रिया काय असते ? आपल्यापैकी कितीजण त्या हास्याला उत्तर म्हणून चटकन प्रतिहास्य करु शकतील ? आपल्या मनात संशय-कल्लोळ सुरु होतो. मेंदु आठवणींच्या फाईली उकरायला लागतो. हा माणुस कोण ? तो मला ओळखतो पण मी त्याला कसा ओळखत नाही ? तो माझ्याकडे बघुन का हसला असेल ? माझ्या तोंडाला काही लागलं तर नाही ? एक ना दोन , हजारो शंका आपल्या मनात घोंगावायला लागतात. माणसाने माणसाकडे बघुन हसणे ही एवढी गंभीर गोष्ट आहे ? कारण काय आहे, आपल्या वाट्याला येणारे हे छोटे छोटे आनंद उपभोगण्याची आपली मानसिक तयारीच नसते. वर्षानुवर्षे आपण "भोग वाईट, त्याग चांगला" हेच बाळकडु स्वतःही प्यालेलो असतो आणि पुढे आपल्या मुलांनाही पाजणार असतो. जैन धर्मामध्ये एक पर्युषण पर्व असतं. ४० दिवसांचा उपवास. आणि हा उपवास करणार कोण ? तर बहुसंख्य लहान मुलं - त्यातही मुलींची संख्या जास्त. ज्यांना अजुन जगाची काही माहिती नाही त्यांना अशा प्रकारे वेठीला धरणारे, त्याग शिकवणारे तुम्ही कोण ? केवळ ते तुमच्यावर अवलंबुन आहेत म्हणुन तुम्ही त्यांचं आयुष्य तुमच्या पद्धतीने घडवणार. ख्रिश्चन धर्मात मुलींना नन बनवले जाते. माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार धर्माच्या नावाखाली हिरावून घेतला जातो. आणि विशेष म्हणजे कोणीही याला अंधश्रद्धा मानत नाही. ज्या देवाने या सृष्टीत सौंदर्य घडवलं त्यानेच कुरुपताही घडवली. आपण ज्या सुखसोयींचा आस्वाद घेतो त्या ईतरांना नाकारण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला ?

हम कहतें है ये जग अपना है, तुम कहतें हो झुठा सपना है
हम जनम बीताकर जायेंगे, तुम जनम गवांकर जाओगे

फक्त तिन कडव्यात साहीर किती गोष्टी सांगुन जातो. पाडगावकरांचं एक बोलगाणं आहे - "यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही " अशी मांणसं पावला पावलाला भेटतात. कुठल्याही चांगल्या गोष्टीशी यांचं वैर असतं. टी.व्ही. वरची काही चॅनेल्स अशा माणसांनी सतत भरुन वाहत असतात. २४ तास ही माणसं एकच गोष्ट सांगत असतात " जे जग मिथ्या आहे. संसार माया आहे. आपण या मायेच्या जंजाळातुन बाहेर पडायला पाहीजे." हे आणि यासारखे असंख्य. यातले काही ह.भ.प. अगदी तरुण म्हणजे ३०-३५ चे असतात. मला सांगा, हे सगळं शिकवायला यांनी आयुष्याचा किती अनुभव घेतला आहे ? छान कपडे घालुन, ए.सी. रुममधे बसुन प्रवचन द्यायचं आणि शिकवायचं काय तर "मायेच्या पाशातुन बाहेर पडले पाहीजे". ज्यांचे विचार आणि कृती यांचा ताळमेळ नाही त्यांना "धर्मगुरु" का मानायचे ?

संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे

https://www.youtube.com/watch?v=pueoTXV6FLY

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

हँसता हुआ नुरानी चेहरा - लक्ष्मीकांत


सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्‍याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले. अचानक शंकर यांनी प्रश्न केला - "क्यो बाबाजी, बच्चोंका काम कैसे चल रहा है ?" यावर रामप्रसादजींचे उत्तर होते - "क्या बतायें, बस आप लोगोंने (एस्.जे.) पान खा कर थुंका हुवा चाट-चाटके दिन निकाल रहें है"
हा किस्सा शब्दशः सगळ्या संदर्भांसकट खरा आहे. कारण एस-जेंच्या ताफ्यात काम करणारे आणि त्यांना देवाच्या ठिकाणी मानणारे माझे दिवंगत मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि गंमत म्हणजे रामप्रसादजींच्या या उत्तराने केवळ शंकर यांचा अहंकार सुखावला असं नाही, तर तिथे उपस्थित सर्वांना ते पटलं. पण एका वडीलांनी नुकत्याच प्रसिद्धीला येणार्‍या आपल्या मुलाबद्दल ईतका हिणकस शेरा मारावा ईतके लक्ष्मीकांत-प्यारेलाल सुमार दर्जाचे होते का ? नुसत्या आकडेवारीत उत्तर द्यायचं झालं तर केवळ ३५ वर्षाच्या कारकिर्दीत ६३५ चित्रपट - म्हणजे साधारणतः ३५०० च्या वर गाण्यांना संगीत देउन एक-दोन नाही तर तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणे, तेही लौकीकार्थाने कुठलेही संगीत शिक्षण पुर्ण न करता (संगीतच काय, त्यांचे शालेय शिक्षणही पुर्ण नव्हते) - हे काय सुमार दर्जाचे लक्षण आहे ? पण काही काही माणसांच्या कपाळावर जन्मतःच नियतीने नावडतेपणाचा शिक्का मारलेला असतो. नाहीतर बघा ना, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन या संगीतकारांची नावे जरी घेतली तरी ऊर भरून येणारी माणसे होती आणि आहेतही. पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बाबतीत हे कधीच झाले नाही.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील लहानपणीच निवर्तल्याने लवकरच त्यांना पोटा-पाण्यासाठी काम करणे भाग पडले. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरंतर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभुत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लता दिदींना साथ केली. त्यावेळी या छोट्या मुलाची कर्तबगारी आणि वादनातील कौशल्य याने लता दिदी भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले. लता दिदी आणि लक्ष्मीकांत यांचा हा स्नेह लक्ष्मीकांतजींच्या मृत्युपर्यत अबाधीत होता. लता दिदींनी लक्ष्मीकांतजींना "सुरील कला केंद्र" या लहान मुलांना संगीतशिक्षण देणार्‍या संस्थेत पाठवले. तिथेच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. वडील मशहूर ट्रंपेटवादक असले तरी का कोण जाणे, त्यांनी या कलेचा वारसा प्यारेलालजींना दिला नाही. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. प्यारेलालजी व्हायोलीन वाजवायला शिकले.
लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी, लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकर च्या ऐवजी "गोडबोले" शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं. गरीबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमीनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले. एक यशस्वी व्यावसायिक ज्या व्यावसायिक क्लूप्त्या वापरतो त्या सर्व त्यांनी बेधडक पणे वापरल्या. वर्षाला जवळ-जवळ १८-१९ चित्रपटांना संगीत देणे हे आजच्या कॉम्प्युटरच्या जमान्यातही अत्यंत कठीण आहे. पण ते त्यांनी यशस्वीपणे (गाण्यांच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने) निभावले होते. आयुष्याची ५० हुन जास्त वर्षे या मोहमयी दुनियेत काढूनही ते कधी वाहावले नाहीत. प्यारेलालजींशी असलेली व्यावसायिक आणि वैयक्तीक मैत्री त्यांच्या मृत्युपर्यंत टिकली. अर्थात यामागे प्यारेलालजींचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. या दोघांचे स्वभाव एकमेकाला पुरक असे होते. लक्ष्मीकांतजी बोलघेवडे तर प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणतात की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही.
आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला. १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या ए ग्रेड कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. (पारसमणीची गाणी लोकप्रिय असली तरी त्यातले ऑर्केस्ट्रेशन हे काही वेळेला अनावश्यक आहे असं माझं वैयक्तीक मत आहे). हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. जयकिशन यांच्या मृत्युनंतर मात्र शंकर यांनी त्यांना कायम आपले प्रतिस्पर्धी मानले.
संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू मुलांबद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. मैत्रीची, स्नेहाची ही अशी उदाहरणे लक्ष्मीकांतजींच्या आयुष्यात जागोजागी सापडतील. आणि अर्थात हा "गिव्ह अँड टेक" मामला असल्याने एल.पी. नी ही केलेल्या सहकार्याचीही उदाहरणे मिळतील. आपल्या जुन्या वादक सहकार्‍यांना फ्री लान्सींगच्या जमान्यातही टिकवून ठेवणे त्यांना बरोबर जमत असे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (संगीतकार गुलाम महंमद यांचे धाकटे बंधू) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. ढोलकचा एल्.पी. पॅटर्न लोकप्रिय होण्यामागे या दोन कलाकारांचा सहभाग मोठा आहे. पैकी लाला पाठारी यांनी काही चित्रपटांना लाला-सत्तार (सारंगीवादक) या नावाने संगीत दिले त्या वेळी एल.पीं. नी त्यांच्याकडे निव्वळ वादक म्हणून मेहनताना न घेता काम केलं. डोक्याने थोडा अधू असणार्‍या आणि ईंडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणार्‍या अब्दूल करीमला (त्यांना खाँसाहेब हे देखील तोंडदेखलं नाव होतं) देखील त्यांनी असाच सांभाळला. मुळचा खानदानी तबलजी असलेल्या करीमच्या ढोलकने राजा और रंक चित्रपटातल्या "मेरा नाम है चमेली" गाण्यात अशी काही जादू केली आहे की गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर खुद्द लता दिदींनी त्याना तिथल्या तिथे ५०० रुपये बक्षीस दिले होते. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली.
लेखाच्या सुरवातीला मी उल्लेख केलेल्या माझ्या दिवंगत मित्राने सांगीतलेला आणखी एक किस्सा. मी एक दिवस असाच जुनी गाणी ऐकत / पहात बसलो होतो. या माझ्या मित्राला शंकर-जयकिशन म्हणजे देवस्थानी. त्यामुळे अकारण एल्.पी. ना दुय्यम लेखण्याचा त्यांचा प्रयत्न. पण त्यामागे काही लॉजीक होतच. तर झालं असच. "सुनो सजना, पपीहेने कहाँ सबसे पुकारके" हे आये दिन बहार के चं टायटल साँग ऐकताना त्यातल्या बासरीच्या तुकड्यांनी मी भारावलो. आणि एक खवचट विचाराने माझ्या मित्राला फोन लावून त्यांना ते गाणं फोनवर ऐकवलं. आणि विचारलं की तुम्ही एल.पी. ना नेहमी दुय्यम दर्जाचे मानता. आता हे गाणं ऐकल्यावर तरी असं म्हणण्याची ईच्छा तुम्हाला होते का ? यावर माझा मित्र उसळला आणि म्हणाला "अरे, हरीप्रसाद चौरासियांना तीन तास या लक्ष्मीकांत ने स्टुडीओत बसवून ठेवलं होतं, पंडीतजी नया कुछ सुनाओ, नया कुछ सुनाओ म्हणत. शेवटी कंटाळून त्यांनी ही धून ऐकवली. बस, मग काय ? तो लक्ष्मीकांत तर भेळवालाच आहे. बाकीची भेळ त्याने उत्तम जमवली."
हे सगळं जरी खरं असलं तरी देखील माझ्या मनात मात्र माझ्या त्या मित्राईतके एल.पी. ना तुच्छ लेखण्याचे विचार कधीच आले नाहीत. याचं कारण ज्या मासेस नी, सर्वसामान्य रसिकांनी त्यांची गाणी उचलून धरली, वारंवार ऐकली त्यांचाच मी ही एक भाग होतो. त्यांचे सुरवातीचे चित्रपट नविन असताना माझा जन्म झाला नसल्याने मी पाहू शकलो नाही , मी ते रिपीट रन ला बघीतले. पण सरगम रिलीज झाल्यावर "डफली वाले" या गाण्यावर धुंद नाचत थिएटर मधे पैसे उधळणारं पब्लीक मी माझ्या डोळ्यांनी बघीतलय. शेवटी चित्रपट हा एक व्यवसाय आहे. ज्यांची कुवत असते पैसे वाया घालवण्याची ते क्लासेस साठी चित्रपट बनवतात आणि तो पडला तरी उच्चभ्रु वर्तुळात मानाने मिरवतात. पण सुभाष घई, मनमोहन देसाई, बॉबी पासून राज कपूर - यांनी या व्यवसायात राहूनही आम जनतेला रिझवण्याचा प्रयत्न केला. आणि यात त्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनीच खरी साथ दिली.
आजही हिरो मधली ती बासरी, कर्जमधली गिटारची धून, दोस्तीमधले माउथ ऑर्गनचे पीस (जे आर.डी. बर्मन यांनी वाजवले होते) कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. तुम्हाला संगीतातले कळो अथवा न कळो, बेसावध क्षणी जे संगीत तुम्हाला डोलायला लावते ते नेहमीच जास्त आपलं वाटतं. आणि हेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं खरं यश आहे. शेवटी "थुंका हुवा चाट-चाट के" या ईंडस्ट्रीत ३५ यशस्वी वर्ष काढता येत नाहीत, ३५०० च्या वरती गाणी देता येत नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मरणानंतर असं किर्तीरूपाने उरता ही येत नाही.
आज दि. २५ मे रोजी लक्ष्मीकांतजींचा १४ वा स्मृतीदिन. त्या निमित्ताने या "आपल्याशा" संगीतकाराला मानाचा मुजरा !
एल.पी. ची माझी आवडती काही गाणी -
तुम गगन के चंद्रमा हो- सती सावित्री (मन्ना डे / लता)
अल्लाह ये अदा कैसी है - मेरे हमदम मेरे दोस्त (यातली सगळीच गाणी आवडती)
मेरा नाम है चमेली - राजा और रंक
खुबसूरत हसीना जानेजां जानेमन - मि. एक्स ईन बाँबे
मेघवा गगन बिच झांके - राजा हरिश्चंद्र (पडद्यावर पृथ्वीराज कपूर आणि हेलन)
मेरे दिवानेपन की भी दवा नही - मेहबूब की मेहंदी
फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर - प्यार किये जा
कोई नजराना लेकर आया हूं मै दिवाना - दो रास्ते
कान्हा, आन पडी मै तेरे द्वारे - शागिर्द
वो है जरा, खफा़ खफा़ - शागिर्द
नजर न लग जायें - नाईट ईन लंडन
मै आया हुं, लेके साज हाथोंमे - अमिर गरीब
सुनो सजना पपीहेंने, कहां सबसे पुकार के - आये दिन बहार के
किसी को पता ना चलें बात का - लुटेरा
ही लिस्ट खरंतर अमर्याद आहे. पण ईथेच थांबतोय. स्मित
*****************************************************
(दिनांक २५ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित ! हा माझा मायबोलीवरचा शेवटचा लेख !)

ऐ मेरे प्यारे वतन - प्रेम धवन


साल १९६१ - निर्माता बिमल रॉय यांचा "काबूलीवाला" प्रदर्शित झाला. रविंद्रनाथ ठाकूरांची (टागोरांची) मुळ जबरदस्त कथा, तिला विश्राम बेडेकरांनी चढवलेला पटकथेचा साज, बलराज सहानी-उषा किरण आणि बेबी फरीदा (जलाल) यांचा अप्रतिम अभिनय आणि या सर्वांवर कळस म्हणून की काय सलील चौधरी यांचे संगीत. असा सगळा सोहळा जमून आल्यानंतर प्रेक्षक भारावतील नाही तर काय ? पण एवढं सगळं असूनही या चित्रपटाचा खरा आत्मा ठरलं मन्ना डे यांनी गायलेलं एक गीत -
माँ का दिल बनके कभी, सिने से लग जाता है तु
और कभी़ नन्हीसीं बेटी, बनके याद आता है तु
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तु
तुझपें दिल कुर्बान
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन
तुझपें दिल कुर्बान
आज या गीताच्या जन्माला ५० वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. तरी देखील जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी येतंच. आम्ही आमच्या देशात राहूनही जर हे होतयं, तर वर्षानूवर्षे भारताबाहेर रहाणार्‍यांचे काय होत असेल ! मन्ना डे यांचा आर्त स्वर, त्याला फक्त एका मेंडोलीनची आणि थोड्याशा र्‍हिदमची साथ आणि या गाण्याचे बोल. सगळं एक अजब रसायन आहे. जे फक्त अश्रुधुर पसरवतं ! स्मित वास्तविक या चित्रपटातली बाकीची सर्व गाणी जी गुलजा़र यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरली आहेत, तीही तितकीच ताकदीची आणि लोकप्रिय आहेत. पण या गाण्याची बातच और आहे.
साल १९६५ - निर्माता केवल कश्यप यांचे नाव पुढे करून मनोज कुमारने चित्रपट निर्मीती मधे उतरायचे ठरवले. मनोज कुमारला या देशातल्या लोकांची मानसिकता अचुक पणे माहीती होती. त्यामुळे त्याने सरळ देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचे योजले. कथा निवडली शहीद भगतसिंग यांची. रामप्रसाद बिस्मील यांच्या काही मुळ रचना त्याने चित्रपटात वापरायच्या ठरवल्या. बाकी गाण्यांचा प्रश्न होता. गीतकार पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) हे मनोजकुमारचे खास मित्र. त्यांनीच मनोज कुमारला प्रेम धवन यांचे नाव सुचवले. चित्रपट प्रदर्शित झाला. मोहम्मद रफी यांच्या आवाजातले रामप्रसाद बिस्मील यांचे "सरफरोशी की तमन्ना" लोकप्रिय झालेच. पण त्याहून लोकप्रिय झाले - "ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम" आणि क्लायमॅक्सला असलेले "मेरा रंग दे बसंती चोला". या चित्रपटाचे संगीतही प्रेम धवन यांचेच होते.
साल १९६६ - फेब्रुवारी महीना - चर्चगेट स्टेशनच्या बाहेर त्याही वेळी चाकरमान्यांचे लोंढे सकाळच्या वेळात असायचेच. या गर्दीमध्ये एक भिकारी हार्मोनियम घेऊन जमेल त्या सुरात गात होता. अचानक गर्दीमधून एक रेघा-रेघांचा बुशकोट घातलेला किंचीत स्थुल बांध्याचा ईसम पुढे आला. त्याने त्या भिकार्‍याची आस्थेने चौकशी केली. थोड्या वेळाने त्याने त्या भिकार्‍या कडून हार्मोनियम मागून घेतली. आणि गायला सुरवात केली - "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा". त्याच्या दैवी आवाजाची जादू लगेच झाली. भिकार्‍याच्या थाळीत त्या दिवशी पैशाचा वर्षाव झाला. त्यात आपलीही थोडी भर घालून तो ईसम जसा आला तसाच निघून ही गेला. हा किस्सा खरा असावा. कारण तो भिकारी म्हणजे स्टंटपटांच्या जमान्यातला एक लोकप्रिय हिरो होता आणि तो दयाळू गायक होता - मोहम्मद रफी. त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या दस लाख या चित्रपटातले तोपर्यंत लोकप्रिय झालेले हे गाणे गाऊन त्या जुन्या सहकार्‍याला मदत मिळवून देणे हे फक्त रफींनाच सुचू शकते. हा किस्सा खरा असु शकण्याचे आणखी एक कारण, मी तो रसरंग या सिने-पाक्षिकामधे श्री. ईसाकजी मुजावर यांच्या लेखात वाचला आहे. ईथे हा किस्सा केवळ एवढ्यासाठी नमूद करावासा वाटला कारण या गीताचे गीतकारही प्रेम धवन हेच होते. थोडे विषयांतर होईल, पण आम्ही मित्र संगीतकार रवी यांना भिकार्‍यांचे मसिहा म्हणायचो. कारण भिकार्‍यांना उपयोगी पडू शकतील अशी एक नव्हे तीन तीन गाणी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात बनली. "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा" - दस लाख, "औलाद वालों फुलों फलों" - एक फुल दो माली आणि "तुझको रख्खे राम, तुझको अल्ला रख्खे" - आँखे. पैकी पहील्या दोन गाण्यांचे गीतकार प्रेम धवन हेच होते हे आणखी विशेष.
१९४८ साली आलेल्या बाँबे टॉकीजच्या "जिद्दी" या चित्रपटाने हिंदी चित्रपटसॄष्टीला ३ नवे कलाकार मिळवून दिले. एक म्हणजे, देव आनंद यांना नायक म्हणून लाभलेलं पहीलंच व्यावसायिक यश त्यामुळे देव आनंद यांची कारकिर्द खर्‍या अर्थाने सुरू झाली. दुसरे म्हणजे प्रेम धवन यांना गीतकार म्हणून पहीला मोठा ब्रेक आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या सर्वात लाडक्या बाळांपैकी एक असलेला किशोर कुमार नावाचा गायक, नायक, संगीतकार आणि बरंच काही. किशोरने गायलेले पहिले गाणे - "मरनेंकी दुवाएं क्युं मांगू, जिने की तमन्ना कौन करे" हे प्रेम धवन यांनीच लिहीलं होतं.
देशभक्तीपर गाणी लिहीताना प्रेम धवन यांच्या प्रतिभेस विशेष बहर येई. "छोडो कलकी बातें, कल की बात पुरानी" हे हम हिंदूस्थानी या चित्रपटातील गीत त्याचे आणखी एक उदाहरण. याचे कारण त्यांच्या बालपणात दडलेले आहे. प्रेम धवन यांचे वडील ब्रिटीश सरकारच्या नोकरी मधे जेल सुपरिंटेंडेंट होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बदल्यांमुळे प्रेम धवन यांनी लहानपणीच तुरूंगात असलेल्या स्वातंत्र्यसैनीकांचे ब्रिटीशांनी केलेले हाल पाहीले होते. पुढे मोठेपणी त्यांनी ला॑होरच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला जिथे त्यांचे वर्गमित्र होते - साहीर लुधीयानवी. साहीरच्या बरोबरीने प्रेम धवन यांनीही वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला. अनेक देशभक्तीपर कविता त्या दोघांनी लिहील्या. ते दोघेही बरोबरीने कम्युनिस्ट पार्टीमधे सामील झाले. पुढे मुंबईला आल्यावर त्यांनी "ईप्टा" मधे प्रवेश केला. ईथे त्यांनी वेगवेगळी नाटके, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. काही काळ ते पं. रवीशंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतही शिकले. याचाच फायदा त्यांना पुढे "शहीद" आणि ईतर काही चित्रपटांना संगीत देताना झाला. पं. रवीशंकर यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचेही धडे घेतले.
पण एवढे सगळे गुण असूनही, दर्जेदार काव्य रचूनही त्यांचे समकालीन गीतकार/कवी शैलेंद्र, साहीर आणि हसरत जयपूरी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात ते अपयशी ठरले. हा एक प्रकारे त्यांच्या प्रतिभेवर झालेला अन्यायच म्हणावा लागेल. आणि रसिकांचं दुर्दैव. संगीतकारांमधे खेमचंद प्रकाश (यांनी त्यांना पहीली संधी दिली), अनिल विश्वास, सलील चौधरी, चित्रगुप्त आणि रवी यांच्याशी त्यांचे विशेष जमायचे. त्यातही सर्वात जास्त (लोकप्रिय) गीते त्यांनी रवी यांच्या संगीतामधे दिली.
काव्याबरोबरच नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती. काही चित्रपटगीतांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विशेष उल्लेख म्हणून नया दौर चित्रपटातील "उडें जब जब जुल्फे तेरी" चा उल्लेख करावा लागेल. या व्यतीरिक्त दो बिघा जमिन, धूल का फूल, गुंज उठी शहनाई, वक्त या आणि अशाच काही चित्रपटांचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले.
त्यांची काही गाजलेली गाणी खालीलप्रमाणे -
१. ऐ मेरे प्यारे वतन - काबूलीवाला (मन्ना डे यांच्या सर्वोत्तम पाच गाण्यांपैकी) *
२. सिनें में सुलगते है अरमान - संगदिल
३. मुझे प्यार की जिंदगी देने वाले - जबक
४. तेरी दुनियासें दूर, चले होके मजबूर - जबक
५. तेरी दुनियांसें, होके मजबूर चला - पवित्र पापी
६. वफा़ जिनसें की, बेवफा़ हो गये -
७. छोडो कलकी बातें - हम हिंदूस्थानी
८. ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम - शहिद
९. मेरा रंग दे बसंती चोला - शहिद (चित्रपटातले गीत प्रेम धवन यांनी लिहीले आहे. मुळ गीत वेगळे आहे)
१०. एवें दुनीया, देवे दुहाई (तेकी मै झूठ बोलीयां) - जागते रहो *
११. तुझें सुरज कहूं या चंदा - एक फुल दो माली
१२. ओ नन्हेसें फरीश्तें - एक फुल दो माली
* - ही दोन्ही गाणी त्या त्या चित्रपटातली प्रेम धवन यांची एकमेव गाणी आहेत. काबूलीवाला ची बाकी गाणी गुलजार यांची तर जागते रहो मधली शैलेंद्र यांची.
असा हा हरहुन्नरी कवी /गीतकार आणि संगीतकार. दि. ७ मे रोजी त्यांचा ११ वा स्मृतीदिन होता. दुर्दैवाने ईतर लेखांच्या गडबडीमधे नजरचूकीने या कलाकाराला योग्य वेळी मानवंदना द्यायची राहून गेली. आयुष्यभर ईतर प्रतिभावान कवींच्या सावलीमुळे थोडासा उपेक्षितच राहीलेल्या या कलाकाराची माझ्यासारख्या किंचीत चित्रपटवेड्याकडूनही चित्रपटांच्या या शतकोत्सवी वर्षात अशी उपेक्षा व्हावी याला काय म्हणावं ? अरेरे
सलाम प्रेम धवनजी ! त्रिवार सलाम !
*****************************************************
(दिनांक ११ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

वक्त नें किया, क्या हसीं सितम - कैफ़ी आझ़मी


साल १९६४. भारत-चीन १९६२ च्या युद्धाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक चेतन आनंद यांचा या युद्धाच्या पार्श्वभुमीवरचा "हकिकत" प्रदर्शित झाला. एका युद्धपटाला मिळतो तितकाच प्रतिसाद या चित्रपटाला सुरवातीला मिळाला. त्यावेळेला आजच्या सारखी प्रदर्शनाआधीच संगीत प्रसिद्ध करण्याची पद्धत रुळली नव्हती. पण लेह-लद्दाखचे खर्‍या युद्धभुमीचे (रमणीय तरी अतिशय बिकट अशा लोकेशन्सवर) केलेले चित्रीकरण, रुढार्थाने धर्मेंद्र-प्रिया राजवंश हे जरी नायक-नायीका असले तरी खरा नायक या चित्रपटाचा विषय आणि त्याचे टेकींग, बलराज सहानी, विजय आनंद, जयंत आणि ईतर मातब्बर अभिनेत्याच्या अभिनयाची जुगलबंदी आणि अबोव्ह ऑल मदन मोहन यांचे संगीत. "होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा", "मै ये सोचकर उसके दरसें उठा था", "जरासीं आहट होती है तो दिल सोचता है" या गाण्यांनी रसिकांना रिझवलं. एका शोकांतीके बरोबर चित्रपट संपतो. प्रेक्षक जड अंतकरणाने उठणार ईतक्यात युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या प्रेतांवर, त्यांच्या वस्तुंवर कॅमेरा फिरतो आणि पार्श्वभुमीवर गाणे सुरु होते - "कर चलें, हम फिदा, जान-ओ-तन साथीयों, अब तुम्हारे हवालें, वतन साथीयों". मदन मोहनचं संगीत, रफीचा आर्त पण समज देणारा स्वर आणि कैफी़ आझ़मी यांचे जबरदस्त शब्द. प्रेक्षागृहातून बाहेर पडू पहाणारा प्रेक्षक मटकन खाली बसतो आणि त्या गाण्याने एक अख्खी पिढी भारून जाते.
"सांस थमती गयीं, नब्ज जमतीं गयीं
फिरभी बढतें कदम को न रुकने दियां
कट गयें सर हमारें तो कुछ गम़ नहीं
सर हिमालय का हमनें न झुकनें दिया
आज धरती बनीं है, दुल्हन साथीयों
अब तुम्हारें हवालें, वतन साथीयों"
माझी आणि कैफ़ीजींच्या काव्याची ही पहीली ओळख. वास्तविक हक़िकतच्या खुप आधीपासून कैफ़ीजी लिहीत होते. १९५२ च्या बुझ़दिल पासून. गुरुदत्त यांच्या १९५९ च्या "कागज़ के फुल" या चित्रपटाने कैफ़ी आझ़मी हे नाव खर्‍या अर्थाने लोकांसमोर आलं. चित्रपट अयशस्वी ठरला (किंवा ठरवला) आणि त्याचे अपयश हे गुरुदत्त यांच्या अकाली मृत्युला कारणीभुत / निमित्त ठरले. असे असले तरी या चित्रपटाच्या गाण्यांनी लोकांना रिझवले. "वक्त नें किया, क्या हसीं सितम", "देखी जमानें की यारी, बिछडें सभीं बारी-बारी" या गाण्यांना प्रचंड लोकाश्रय लाभला. कैफ़ीजींचा मुळ पिंड हा एका कवीचा/शायराचा होता. त्यामुळे त्यांच्या गैरफिल्मी गझल, उर्दु काव्य यांना आधीपासूनच रसिकाश्रय लाभला होता. मी मात्र ईथे फक्त त्यांच्या हिंदी चित्रपटसंगीतातल्या योगदानाचाच विचार करतो आहे. हिर-रांझा या डोळ्यांवर अत्याचार करणार्‍या (राजकुमार-प्रिया राजवंश) चित्रपटात कैफ़ीजींच्या काव्यात्मक संवादांनी आणि गाण्यांनी थोडीफार जान फुंकली होती. पण काव्यात्मक संवाद पुर्ण चित्रपटभर हा खरोखरच कंटाळवाणा प्रकार होता. त्यातली "मिलो न तुम तो हम घबरायें" आणि "यें दुनियां, ये महफ़ील, मेरे काम की नही" (सं. मदन मोहन) ही गाणी लोकप्रिय ठरली.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेचे बी.बी.सी. ने केलेले चित्रीकरण फिल्म्स डिव्हीजन कडे होते. दिग्दर्शक राज मरब्रोस यांना ते चित्रीकरण आपल्या चित्रपटात वापरण्याची ईच्छा होती. त्यांनी ती संगीतकार मदन मोहन यांच्याकडे व्यक्त केली. चित्रपट होता "नौनीहाल". प्रकरण सरकार-दरबारी रुजू झाले. पण भारताचे पहिले पंतप्रधान. त्यांच्या अंत्ययात्रेचे चित्रीकरण व्यावसायिक चित्रपटात वापरणे ही व्यवसायाची क्लुप्ती असली तरी या प्रसंगाचे गांभिर्य राखणे जरूरी होते. मदन मोहन यांनी आपले मित्र कैफ़ीजींना पाचारण केले. त्याच्या कडून एक सुंदर गाणे लिहून घेतले. त्याला अप्रतिम चाल बांधली. आणि केवळ त्या गाण्याच्या जोरावर ते चित्रीकरण चित्रपटात वापरण्याची परवानगी मिळवली. ते गाणे होते -
मेरी आवाज सुनो, प्यार का राग सुनो
मैने ईक फुल जो सिनेंसे लगा रखा था
उसके परदेंमे तुम्हें दिल़सें लगा रखा था
था जुदा सबसें मेरें ईष्कका ईजहार सुनो
एका फालतू चित्रपटाला या गाण्याने आणि मदन मोहन यांच्या संगीताने थोडा काळ का होईना जगवलं. याच चित्रपटातले "तुम्हारी जुल्फं के सायें में शाम कर लुंगा" हे गाणेही गाजले.
कैफीजींची काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -
१. चलतें चलतें युंही कोई मिल गया़ था - पाकिझा
२. चलो दिलदार चलो - पाकिझा
३. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे - पाकिझा
४. थाडे रहीयों ओ बांके यार - पाकिझा
(पाकिझा चा उल्लेख मी मुद्दाम टाळलाय कारण इतरत्र याविषयी भरपूर लिहीलं गेलं आहे)
५. बहारों, मेरा जिवन भी सवारों - आखरी़ खत
६. धीरें धीरें मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा
७. कुछ़ दिलनें कहां - अनुपमा
८. जानें क्या ढुंढती रहती है ये आँखें मुझ़में - शोला और शबनम़
९. जीत ही लेंगे बाजी हम तुम - शोला और शबनम़
१०. हर तरफ अब यही अफसाने है - हिंदुस्थान की कसम
११. तुमं बिन जिवन कैसे जिवन - बावर्ची (मन्ना डें यांचे अप्रतिम गाणे)
१२. भोर आयी गया अंधीयारा - बावर्ची
१३. काहें कान्हा करत बरजोरी - बावर्ची
१४. ये नयन डरें डरें - कोहरा
१५. झुम झुम ढलतीं रात - कोहरा
१६. तुम जों मिल गयें हो - हसतें जख्म़
१७. बेताब़ दिलकी, तमन्ना यहीं है - हसतें जख्म़
अलीकडच्या काळातली "अर्थ" ची गाणीही त्यांचीच होती.
कैफीजींवर काही लिहावं की लिहू नयें या द्बिधा मनःस्थितीत मी होतो. याचे एकमेव कारण त्यांच्या मुलीचा - शबानाचा - मला न आवडणारा सेक्युलर (आणि म्हणून कुरुप) चेहरा. पण वर दिलेल्या गाण्यांच्या यादीवर नजर टाकली की लक्षात येईल, की त्यांची आठवण न करणे हा स्वतःवरतीच अन्याय झाला असता. कारण मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचही योगदान आपल्यासाठी ईतर कुठल्याही महान कवीईतकंच मोठं आहे.
"खिंच दो अपनें खुन सें जमींपर लकींर
ईस तरफ आने पायें ना रावण कोई
तोड दो हाथ, अगर हाथ उठने लगें
छुने पायें ना सीता का दामन कोई
"
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची आठवण १९६४ मध्येच करून देणार्‍या कैफीजींचा एवढा तरी सल्ला आपल्या आंधळ्या न्यायव्यवस्थेने मानला असता ना तरी आजच्या सारखी विदारक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसली नसती. पण "वक्त नें कियां, क्या हसीं सितम, तुम रहें ना तुम, हम रहें ना हम" हे स्वतःचेच काव्य जगत असल्यासारखे कैफीजीं जिवनाच्या अंतीम टप्प्यात (कदाचित मुलीच्या आहारी जाऊन) एका ठराविक गटाची भलामण करताना दिसावे हे दुर्दैव.
या दर्जेदार गीतकाराचा उद्या १० मे रोजी १० वा स्मृतीदिन. त्या निमित्त कैफीजींना मानवंदना ! स्मित
***********************************
(दिनांक ९ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

ये हवां ये रात यें चांदनी - तलत


एक उदास संध्याकाळ. मुड बिनसण्याचे कारण काहीही असू शकते, पण आपल्याला अगदी एकटंच रहावंसं वाटतयं. मनात विचारांचा कल्लोळ आहे पण आपण नक्की काय विचार करतोय हेच लक्षात येत नाहीये. आपण असेच गच्चीवर एका कोपर्‍यात कोर्‍या नजरेने दूर पहात उभे आहोत. हळूहळू अंधाराच्या सावल्या आणखी गडद होतायत. आणि नेमकं अशा वेळी हवेच्या लहरींबरोबर कुठून तरी एक स्वर आपल्या कानांवर पडतो -
शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम
आ भी जा, आ भी जा, आज मेरे सनम
स्वतःच्या नकळत आपण त्या स्वरामध्ये कधी गुरफटत गेलो आपलं आपल्यालाच कळत नाही.
तलत - नावाबरोबरच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत हा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. म्हणूनच प्रेमाचा पहिला ईजहार, तो ही समोर बोलण्याची हिम्मत न झाल्याने फोनवरून केलेला. तो रफी किंवा किशोर यांसारख्या दमदार आवाजाच्या गायकांच्या आवाजापेक्षा तलतच्या हळूवार, किंचीत कापर्‍या स्वरातच होणे जास्त सयुक्तिक वाटते. (चित्रपट - सुजाता, गाणे "जलतें है जिसके लिए").
वर उल्लेख केलेल्या दोन गायकांपेक्षा किंवा अगदी समकालीन ईतर गायकांपेक्षा (मुकेश, मन्ना डे) तलत च्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलतचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्याचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला (अगदी शेवटपर्यंत). मग गाण्यातल्या भावना वेग-वेगळ्या का असेनात. "सिनें में सुलगते है अरमान" असो की "ओ दिलदार, बोलो एकबार, क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे" सारखे आनंदी ड्युएट असो, तलतचा आवाज हा तलतचाच राहीला. आणि तरीही ही गाणी लोकप्रिय झाली कारण हा आवाज जास्त आपलासा वाटला.
रफीच्या उदयाआधी तलत हा ट्रॅजेडीकिंग (असे त्या वेळेला बिरूद असलेल्या) दिलीपकुमारचा आवाज होता. नंतरही अगदी रफीच्या चलतीच्या काळात सुद्धा बर्‍याच चित्रपटात तो दिलीपकुमारचा आवाज होता. असं असलं तरी तलत हा कधीही कुठल्या ठराविक कँपमधे अडकला नाही. याचं कारण त्याचा स्वभाव. अतिशय मनमिळावू आणि सज्जन माणूस असंच त्याचं वर्णन करावं लागेल. कदाचित याच स्वभावाच्या बळावर त्याने अनिल विश्वास आणि सज्जाद हुसेन यांसारख्या ईंडस्ट्रीने भांडकुदळ ठरवलेल्या संगीतकारांकडेही सहजगत्या काम मिळवलं. संगदिल या चित्रपटातले "ये हवा ये रात ये चांदनी" हे गाणे सज्जाद हुसेन यांचे सर्वोत्तम गाणे तलतच्याच आवाजात आहे. तलत ने ईंडस्ट्रीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्याचे उर्दु उच्चार हे ईतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला. मी सुरवातीला उल्लेख केलेले "शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे.
तलतवर आजवर ईतके भरभरून लिहून आले आहे आणि ईंटरनेटवर तर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. असे असूनही मला लिहावेसे वाटले कारण तलत काय किंवा शंभर वर्षांच्या या ईंडस्ट्रीमधला छोट्यातला छोटा कलाकार काय, या सर्वांचे माझ्या/आपल्या भाव-विश्वावर ईतके उपकार आहेत की त्या उपकारांची परतफेड या जन्मात तरी आपण करू शकणार नाही. भारतीय चित्रपटाच्या या शतकमहोत्सवी वर्षात या कलाकारांवर दोन शब्द लिहून निदान त्यांची आठवण आपल्या मनात परत जागवावी एवढाच हेतू.
तलतची सर्वोत्तम गाणी या विषयी एक स्वतंत्र लेख माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कुणी लिहू शकेल. त्या मुळे मी ते टाळतोय. तरीही काही गाणी ज्यांचा उल्लेख टाळणे जिवावर आलंय.
१. ये हवां ये रात यें चांदनी - संगदिल - सं. सज्जाद हुसेन
(पुढे मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या "आखरी दांव" या चित्रपटातलं "तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा" हे गाणं हुबेहूब याच चालीवर आहे. या वरून आधीच शिघ्रकोपी असलेल्या सज्जाद हुसेन यांनी म्हणे भरपूर तमाशा केला होता)
२. मैं दिल हुं ईक अरमान भरा - अनहोनी - सं. रोशन
(राज कपूरसाठी गायलेलं तलत चे एकमेव गाणे)
३. रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए - उसने कहा था - सं. सलील चौधरी
४. हमसे आया न गया - देख कबिरा रोया - सं. मदन मोहन
५. सिनें में सुलगते है अरमान - तराना - सं. अनिल विश्वास
६. ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग - सं. शंकर जयकिशन
७. तस्विर बनाता हुं - बारादरी - सं. नाशाद (नौशाद नव्हे)
८. जलतें है जिसके लिए - सुजाता - सं. सचिन देव बर्मन
९. रात ने क्या क्या ख्वाब दिखायें - एक गांव की कहानी - सं. सलील चौधरी
ही माझ्या आवडीची काही गाणी जी आत्ता आठवतायत. ही यादी आणखीही खुप वाढू शकते. आता थोडी तांत्रिक माहीती - तलत ने एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्याने केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्याला पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. त्याच्या गैरफिल्मी गाण्यांमधे बहुतांश गझल आहेत. आणि ही गाणी देखील त्याच्या फिल्मी गाण्यांईतकीच लोकप्रिय आहेत. त्याने जगातल्या कित्येक देशात जाहीर कार्यक्रम केले आणि तेही प्रचंड लोकप्रिय ठरले. अभिनेता म्हणूनही त्याने एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी ९ चित्रपटात त्याने नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान (याची निर्मितीही तलतचीच होती)", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही ठळक नावे. पैकी सोने की चिडीयां मधे त्याने नकारात्मक नायकाची भुमिका केली होती. या सर्व चित्रपटांची गाणी सुपरहिट होऊनही अभिनेता म्हणून तलत काही यशस्वी ठरला नाही. या व्यतिरिक्त २ मराठी चित्रपटांसाठी देखील त्याचा आवाज वापरला गेला होता. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले (सं. वसंत प्रभु) "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले.
नौशाद यांनी संगीत दिलेल्या "आदमी" या चित्रपटासाठी रफी आणि तलत यांच्या आवाजात एक सुंदर ड्युएट रेकॉर्ड झाले होते. "कैसी हसीन आज यें तारोंकी रात है". पण चित्रीकरणाच्या वेळेला कुठे माशी शिंकली देव जाणे, चित्रपटात हे गाणं तलतच्या ऐवजी महेंद्र कपूरच्या आवाजात आहे.
भारत सरकारने त्यांना पद्मभुषण सन्मानाने गौरवले होते. अशा या तलतचा उद्या दि. ९ मे हा १४ वा स्मृतीदिन. त्यानिमीत्त या महान कलाकाराला मानाचा मुजरा !
"कहतें है के गालिब़ का था अंदाज-ए-बयां और" असं मिर्झा गालिब़च्या बाबतीत म्हटलं जायचं. पण मला विचाराल तर तलतच्या आवाजात "दिल-ए-नादां, तुझे हुवा क्या है" असं विचारणार्‍या गालिब़चा अंदाज-ए-बयां अगदी अस्साच असणार या बाबत माझ्या मनात कुठलेही दुमत नाही.
******************************************
(दिनांक ८ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

नौशाद अली


उद्या म्हणजे ५ मे २०१२ ला नौशादजींना जाऊन ६ वर्षे होतील. ईस्लाम धर्मात पुण्यतिथी वगैरे असते की नाही ते माहिती नाही पण मी आणि माझे काही मित्र दरवर्षी जितक्या श्रद्धेने ३१ जुलैला रफींची पुण्यतिथी साजरी करतो तितक्याच श्रद्धेने गेली ४ वर्षे नौशादजींची पुण्यतिथीही साजरी करतो. साजरी करतो म्हणजे काय, एकत्र जमतो. त्यांची गाणी पहातो, ऐकतो, काही प्रमाणात म्हणण्याचाही प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यात माझ्यावर नौशादजींच्या संगीताचा जास्त पगडा आहे. मी जे काय थोडं-बहूत (लोकांच्या मानाने थोडं, माझ्या दृष्टीने बहूत फिदीफिदी) शास्त्रिय संगीत शिकलो त्याला नौशादजींची गाणी (मुख्यतः रफीने गायलेली) गाण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला.
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरवात नौशादजींनी केली. तांत्रीकदृष्ट्या सांगायचं झालं तर १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी (१९४४ - रतन, १९४६ - अनमोल घडी, १९५२ - बैजू बावरा, १९५७ - मदर ईंडीया आणि १९६० - मुघल-ए-आझम), १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचं संगीत नौशादजींचं होतं. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते.
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही असं म्हटलं जातं. ही कदाचित त्यांच्या (माझ्यासारख्याच) चाहत्यांची अतिशयोक्तीही असू शकते. पण त्या मागे नौशादजींच्या अलौकीक प्रतिभेचे कौतूक आणि आदर आहे. रफी आणि नौशाद यांच्या स्नेहबंधाबद्दल मा.बो. वरील काही रसिक आणखी प्रभावीपणे लिहू शकतील. म्हणून मी तो भाग शक्यतो टाळतोय. पण नौशादजींच्या संगीतातून रफीला वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्या आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच.
हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी ( आज गावत मन मेरो झुमके) तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्‍या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे (सोहनी-महिवाल) ही आणि अशीच काही नौशादजींची ठळक योगदानं.
बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने (विडा उचलल्यासारखा) केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना (माबो वर असा माणूस विरळाच) या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी (लताच्या स्वर्गिय आवाजात) या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात.
पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची. त्या गाण्याच्या तिसर्‍या कडव्यातली शेवटची ओळ - जिसके दिलमें प्यार न हो, वो पत्थर है ईन्सान कहाँ - हे म्हटल्यानंतर रफी अक्षरशः ओरडलाय.
नौशादजींचं निधन जरी २००६ साली झालं असलं तरी १९६८ नंतर त्यांचं संगीतक्षेत्रातलं योगदान नगण्यच होतं. एकाएकी प्रतिभेचा झरा असा कसा आटू शकतो हे एक कोडंच आहे. पण जेवढं काही त्यांनी त्या २६ वर्षात दिलयं ते आणखी १०० वर्षं तरी आनंद देत राहील हे नक्की.
आणखी काही वैशिष्ट्य -
१. एखादे गाणे जर ३ कडव्यांचे असेल तर पहिल्या आणि तिसर्‍या कडव्याची चाल सारखी ठेवून मधले कडवे वेगळ्या चालीत ठेवण्याचा ट्रेंड बर्‍याच गाण्यांमधून आपल्याला दिसतो. याची पहीली सुरवात करण्याचं श्रेय नौशादजींना जातं.
२. नौशादजींच्या हसर्‍या, नर्मविनोदी स्वभावाचा उल्लेख वर एका प्रतिसादात आलाय. "कोहिनूर" च्या चित्रीकरणाच्या वेळी नौशादजींचा हा पैलू पाहीला मिळाला. हा चित्रपट (आणि आझाद - सं. सी.रामचंद्र) हा दिलीपकुमार यांना त्यांची ट्रॅजेडीकिंग ह्या त्यांच्या ईमेजमधून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडला. हा एक पोशाखी चित्रपट होता (राजे-रजवाड्यांच्या काळातला). पण याच्या संवादांमधे ईंग्लीश शब्दांचा, वाक्यांचा सर्रास वापर केला गेला आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून एक हलका-फुलका चित्रपट बनला. यामागे प्रेरणा नौशादजींचीच होती. निर्माता आणि दिलीपकुमार हे दोघेही त्यांचे मित्र असल्याने त्यांनीही ही कल्पना उचलून धरली होती. या चित्रपटातली सगळीच गाणी अप्रतिम. पण त्यातही "ढल चुकी शाम-ए-गम" मला जास्त आवडतं ते त्यातल्या ताल आणि चालीच्या प्रयोगामुळे. तिनही ड्युएट्स, रफीची तीन सोलो आणि उस्ताद विलायतखान यांची सतार - सगळंच दैवी. या चित्रपटासाठी दिलीपकुमार सहा महिने सतार वादन शिकत होते.
३. मुगल-ए-आझम मधले "जिंदाबाद जिंदाबाद" हा एक असाच प्रयोग होता. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा एक सुंदर फोटो माझ्याकडे होता. तर चाळीस स्त्री-पुरुषांचा कोरस आणि रफी यांच्यासाठी केवळ एकच हँगीग माईक लावून या गाण्याचं रेकॉर्डींग केलं होतं. या गाण्याच्या शेवटी कोरसच्या वरच्या आवाजात रफी जेव्हा "जिंदाबाद जिंदाबाद" म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. नौशादजींकडे रफी जेवढा "ओरडलाय" ना तेवढा शम्मी कपूरसाठीही ओरडला नसेल. याचं आणखी एक उदाहरण - गंगा जमनातलं "नैन लड जई है" चा शेवट.
४. "पालकी" हा चित्रपट नौशादजींची स्वतःची निर्मीती होती. या मधे मात्र त्यांनी प्रायोगीकतेचा अतिरेक केला आहे (हे माझं वैयक्तिक मत आहे). याचं उदाहरण म्हणजे रफींचं कधीही न विसरता येणारं सोलो - कल रात जिंदगी सें मुलाकात हो गयी. चाल किती अनवट असावी की ध्रुवपद सोडलं तर एकही ओळ दुसरीसारखी नाही.
५. "आदमी" हा त्यांच्या उतरतीच्या काळातला चित्रपट (असावा). या मधे त्यांनी रफी आणि तलत च्या आवाजात एक अप्रतिम ड्युएट रेकॉर्ड केलं होतं - कैसी हसीन आज यें, तारोंकी रात है. पण दुर्दैवाने शुटींगच्या वेळी काहीतरी गडबड झाली (कोणी म्हणतात की मनोजकुमार ने केली) आणि प्रत्यक्ष पडद्यावर हे गाणं रफी आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे. अर्थात महेंद्र कपूरने ही ते चांगलंच म्हटलं आहे. पण मी जेव्हा ओरीजीनल ऐकतो तेव्हा मला तलतचं जास्त चांगलं वाटतं.
६. राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला-सिमी गरेवाल यांचा "साथी" हा मात्र त्यांची प्रतिभा त्यांना सोडून जात असल्याचा पुरावा देतो. याही चित्रपटातली गाणी चांगलीच होती. पण राजेंद्रकुमार साठी मुकेशचा वापर आणि केवळ शंकर-जयकिशनच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वापरलेलं अतिरिक्त ऑर्केस्ट्रेशन - ऐका "मेरा प्यार भी तु है, ये बहार भी तु है" हे ड्युएट. एके काळी अगदी कमी वाद्यवापर करून केवळ आपल्या चालींनी रसिकांना खिळवणार्‍या या प्रतिभावंताची काळाच्या ओघात टिकण्यासाठी केलेली ही धडपड होती.
बाकी नौशादजी स्वतः शायरी करत. त्याचं एक उदाहरण म्हणजे रफींच्या निधनानंतर त्यांनी रचलेले शेर. त्यातला एक साधारण असा होता - गायकी था हुस्न-ए-फन तेरा रफी, तेरे फनपें हमें नाज है, मेरी सांसोमें तेरी आवाज है, मेरे गीतोंमे तेरी आवाज है !
चित्रपटसंगीतातील (पडद्यावरील सादरीकरणातील) एका आणखी गोष्टीचा पहिलटकराचा मान नौशादजींकडे जातो. हिंदी चित्रपटातील नायक पहिल्यांदा पियानोवर बसला तो नौशादजींच्या संगीतामध्येच. चित्रपट होता मेहबूबखान यांचा "अंदाज" आणि गाणे होते "तु कहें अगर जिवनभर मै गीत सुनाता जाऊं". अर्थात या मागे मेहबूबखान यांचीच कल्पना होती. पियानोचा त्या चित्रपटातील एका पात्रासारखा वापर केला गेला आहे. ईतके त्याला महत्व आहे. तर सांगायची गोष्ट अशी की त्यापुर्वीही संगीतामधे पियानोचा वापर झालाही असेल. पण या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पियानो वाजवणारा नायक आणि पियानोच्या दर्शनी भागाचा स्टँड सारखा वापर करत त्यावर दोन्ही हाताची कोपरे टेकवून नायकाकडे कौतूक + प्रेमाने बघणारी नायिका हा रोमँटीसिझमचा नवा फॉर्म्युला एवढा लोकप्रिय झाला की त्यानंतर अनेक वर्षे कोणीही ऐरागैरा नत्थुखैरा उठायचा / उठायची आणि सरळ पियानो "बडवत" सुटायचे. पियानो हे खरंतर कष्टसाध्य वाद्य आहे. पण हिंदी चित्रपटात त्याचा उपयोग ९९% वेळा "सुरवाद्य" नसून "तालवाद्य" असल्यासारखा तो "बडवला" गेला आहे. (पहा - गाणे "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" - सादरकर्ते श्री. शत्रुघ्न सिन्हा फिदीफिदी) ! आणि हे अगदी आता-आता पर्यंत चालत आले आहे.
नौशादजींची आणखी एक देणगी म्हणजे गाण्यांमधे त्यांनी अ‍ॅडलीब चा केलेला प्रभावी वापर. याची सुरवात झाली "दिदार" मधल्या "हुवे हम जिनके लिए बरबाद" ने. त्या गाण्याच्या सुरवातीचा "असिर पंजाए, अहदे शबाब" ही अ‍ॅडलीब गाण्याईतकीच लोकप्रिय ठरली होती. (विषयांतर होईल, पण ऑर्केस्ट्रात गाणार्‍या कलाकारांसाठी ही एक मोठी देणगी ठरली. साधारणतः व्हॉईस ऑफ रफी म्हणून गाणारे बहुतांश कलाकार एंन्ट्रीला अशी गाणी निवडतात. म्हणजे स्टेजवर काळोख आणि विंगमधूनच वर दिलेली किंवा "चले आज तुम जहांसे" ही "ओ दुरके मुसाफिर" ची अ‍ॅडलीब गायची आणि मग स्टेजवर पुढचे गाणे गात-गात यायचे - हमखास टाळ्या वसूल) स्मित
*********************
(दिनांक ४ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

मन्ना डे - नाबाद ९३ !


(दि. ०२ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

प्रबोधचंद्र डे उर्फ मन्ना डे यांनी काल वयाची ९३ वर्षे पुर्ण केली. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना !
सगळं काही असून एका अर्थाने उपेक्षित असा हा महान कलाकार ! मन्नादांनी स्वतः ही बोच वारंवार बोलून दाखवली. अर्थात उत्तर आयुष्यात. त्यांच्या काळात अशी खंत करणे, हेवे-दावे करणे, दुसर्‍याचं काम पळवणे वगैरे प्रकार होत नसत. काम मिळवण्याची धडपड त्याही वेळेला होती. पण स्पर्धा ही निकोप असायची. स्वतःची रेषा मोठी दिसावी म्हणून दुसर्‍याची रेषा पुसण्याचे विचार त्यावेळेला कुणी करत नसत. त्याऐवजी मेहनत वाढवून स्वकर्तुत्वाने आपली रेषा कशी वाढेल याकडे त्या कलाकारांचे जास्त लक्ष असायचे. पण काही कलाकारांचे नशिब ही कधी कधी साथ देत नसते. त्यामुळे मुकेश, तलत आणि रफी यांच्या बरोबरीने (कधी कधी या सर्वांच्या वरचढ) काम करूनही मन्नादा कधी नायकाचा आवाज बनू शकले नाहीत. आता असं लक्षात येतय की कितीही नाही म्हटलं तरी भाषावार संगीतकारांचे कॅंप त्याही वेळेला होते. बघा ना, आर्.के. कँप सोडला तर मुकेशचा सर्वात जास्त वापर कल्याणजी आनंदजींनी केला. रफीचा वापर नौशाद आणि ओ.पी. नय्यर यांनी केला. किशोरला तर सुरवातीला फक्त दादा बर्मन यांनीच वापरला. तलत, हेमंतकुमार हे तसे फारसे कँपातले नव्हते. पैकी हेमंतकुमार तर स्वयंभू होते आणि स्वत:च ईतकी सुंदर कंपोझीशन्स करून स्वतःच गात होते. यामुळे मन्नादांना वाली फक्त बंगाली संगीतकार - सचिनदेव बर्मन आणि सलील चौधरी हेच होते. दादा बर्मन तर मन्नादांचे मेंटॉरच होते. चित्रपटातलं पहीलंवहीलं हिट गाणं - उपर गगन विशाल - मन्नादांना दादा बर्मन यांनीच दिलं. मन्नादांच्या नशिबाने ईथंच त्यांना पहिला फटका दिला. त्या काळातल्या हिट नायकांनी स्वतःचे आवाज आधीच ठरवून टाकले होते. उदा. दिलीप कुमार - मुख्यतः रफी आणि तलत. राज कपूर - मुकेश आणि काही प्रमाणात तलत. देव आनंद - हेमंतकुमार, रफी, किशोर. यामुळे मन्नादांचं पहिलं हिट गाणं देखील कुणा नायकाच्या तोंडी नसून बॅकग्राऊंडला होते. पण मन्नादा खचले नाहीत. आपलं नाणं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खणखणीतपणे वाजवतच राहीले. त्यांना लोकप्रियता पण खुप लाभली. पडद्यावर सादर करणारा कलाकार कुणीही असला तरी मन्नादांनी प्रत्येक गाणं हे समरसूनच गायलं. त्याचं फळही नंतरच्या काळात त्यांना मिळ्त राहीलं. पुढे शंकर-जयकिशन यांनी चक्क रफीला डावलून शम्मी कपूरचा आवाज म्हणून त्यांना उजाला मधून पेश केलं. उजालातली सगळी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. राज कपूर साठी आर.के. कँप मधे त्यांनी श्री ४२० मधे आवाज दिला. "दिल का हाल सुने दिलवाला", "मुड मुडके न देख" ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. आर.के. कँप व्यतीरिक्त केलेल्या राज कपूरच्या "चोरी चोरी", "दिल ही तो है" ई. चित्रपटासाठी मन्नादांनी पार्श्वगायन केले. या सगळ्या काळात त्यांची समांतर ईतर भाषेतही गाणी चालू होती. मराठीमधे "घन घन माला नभी दाटल्या", "अ आ आई, म म मका" या आणि अशा अनेक गाण्यांचं पार्श्वगायन त्यांनी केलं. बंगालीमधे तर दादा बर्मन, सलील चौधरी आणि रविंद्र संगीत गायन त्यांनी केलं. मल्याळम भाषेतल्या "चेम्मीन" या सलील चौधरी यांनी संगितबद्ध केलेल्या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण हे सगळं असूनही कुठेतरी काहीतरी राहून जात होतं. मन्नादांचं नाव फक्त शास्त्रीय संगितावर आधारित गाणी गाणारा गायक म्हणूनच प्रसिद्ध होतं. रफी करू शकत असलेल्या सगळ्या गोष्टी गळ्यातून उतरवण्याची तयारी असलेल्या मन्नादांना मात्र बहुतेक वेळेला सहनायक असलेल्या व गाणं असलंच पाहीजे ही अट असलेल्या मेहमूद साठी गाणं भाग पडलं. याचा वाईट परिणाम ईतकाच झाला की पडद्यावर मेहमूद असल्याने मन्नादांनी जिव ओतून गायलेल्या (मुख्यत: शास्त्रीय संगीतावर आधारीत) काही गाण्यांकडे लोकांनी गंभिरपणे लक्षच दिलं नाही. अर्थात त्यामुळे मन्नादांनी आपल्या पुढच्या गाण्यामधे याचा परिणाम होऊ दिला नाही हे त्यांचं मोठेपण. उदा. काही गाणी - जिद्दीमधले "प्यार की आग में", पडोसन मधली "सावरीया आणि एक चतूर नार", भूतबंगला मधील "आओ ट्विस्ट करें" ई. याव्यतिरिक्तही काही गाणी मला आठवतात - दुज का चांद मधलं "फुलगेंदवा न मारो" हे गाणं नुसतं ऐकलं की त्यातल्या हरकती किती कठिण आहेत हे लक्षात येतं पण पडद्यावर आगाने ते सादर केल्यामुळे गाणं बघताना हसण्याच्या नादात मन्नादांची कामगिरी दुर्लक्षली जाते. तिच गोष्ट दिल ही तो है मधल्या "लागा चुनरी में दाग" गाण्याची. पडद्यावर ते विनोदी पद्धतीने सादर केले गेले आहे. मेरे हुजूर मधले "झनक झनक तोरी बाजे पायलीया" पडद्यावर जरी विनोदी पद्धतीने सादर केले नसले तरी त्या गाण्यावर राजकुमारला बघून विनोद निर्मीती आपोआपच होते. देख कबिरा रोया मधलं "कौन आया मेरे मनके व्दारे" हे गाणं अनुपकुमारच्या तोंडी आहे जो केवळ किशोरकुमारचा भाऊ असल्याने विनोदी कलाकार समजला गेला. बात एक रात की मधे जॉनी वॉकरच्या तोंडी असलेली दोन अप्रतिम गाणी - पैकी एक "किसने चिलमनसें मारा" आणि दुसरे ओठावर आहे पण लक्षात येत नाहीये - ही अशीच वाया गेली.
आता दोन किस्से - पहीला प्रसिद्ध किस्सा आहे बसंत बहार चित्रपटातील "केतकी गुलाब जुही" या जुगलबंदीचा. तो मन्नादांच्या तोंडून ऐकताना आणखी मजा येते. संगितकार जयकिशनच्या असीस्टंट ने मन्नादांना फोन करून सांगीतले की मुख्यतः बसंत या रागावर आधारित एक जुगलबंदी आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता फेमस स्टुडीओमधे या. मन्नादा म्हणतात की दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून थोडाबहूत रियाज करून मी स्टुडीओत पोचलो. आता चित्रपटातली जुगलबंदी म्हणजे समोर बहूतेक करून रफीच असणार. मजा येईल जरा गायला. स्टुडीओत पोचलो पण रफी काही दिसेना. सगळीकडे शोधलं. तर म्युझीकरूम मधे पं. भिमसेनजी जोशी बसलेले दिसले. वाटलं आले असतील एखाद्या शास्त्रिय गायनाच्या रेकॉर्डींगला. इतक्यात समोर शंकर दिसले. मला म्हणाले चला, चला ! आपण म्युझीकरूम मधे जाऊ ! मी तुम्हाला चाल समजाऊन देतो ! मी म्हटलं, शंकरजी, ते ठिक आहे. पण दुसरा गायक कोण आहे ? रफीच आहे ना ? तो तर आलेला दिसत नाही ! ते म्हणाले, नाही ! रफी नाही ! पं. भिमसेनजी जोशींबरोबर तुम्हाला ही जुगलबंदी गायची आहे ! मी अक्षरशः तिन-ताड उडालो. हे मला अपेक्षितच नव्हतं. माझ्या तयारीचा प्रश्न नव्हता. पण तरीही पं. भिमसेनजी जोशी ? मग मी काय केलं ? अक्षरशः पळालो ! दोन दिवस मुंबई सोडून गेलो. पण शेवटी पं. भिमसेनजी जोशीजींनी स्वतःच मला समजावलं. चित्रपटसंगितात हे चालायचंच. पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं ! पण शेवटी एकदाचा सुवर्णमध्य निघाला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं !
दुसरा किस्सा आहे - "मेरी सुरत तेरी आँखे" या चित्रपटावेळचा. काही कारणाने माझ्या गळ्याला संसर्ग झाला होता आणि आवाज निट काम करत नव्हता. त्या चित्रपटातली बाकीची गाणी झाली होती. पण एक मुख्य गाणं - अहिरभैरव या रागावर आधारीत - पुछो ना कैसे मैने रैन बितायी - हे रेकॉर्ड होण्याचे बाकी होते. या गाण्यासाठी संगितकार दादा बर्मन यांना माझाच आवाज वापरायचा होता. आणि माझा गळा काही ठिक होत नव्हता. दिवस वाया जात होते. मी माझी असमर्थता दादांना सांगून पाहीली आणि वेगळा गायक घेण्याचे सुचवले. पण तेही हटूनच बसले होते. शेवटी हो-नाही करत एके दिवशी रेकॉर्डींग ठरले. फायनल टेकच्या वेळेला पहीलं कडवं व्यवस्थित झाल्यावर एके ठिकाणी माझा आवाज तुटला (चिरकला). त्या वेळेला आजच्या सारखं ट्रॅक रेकॉर्डींगची सोय नव्हती. चुकलं की पुर्ण गाणं परत रेकॉर्ड करावं लागे. मी दादांकडे बघीतलं. त्यांनी नजरेनेच मला "चालू राहू दे" असा ईशारा केला. रेकॉर्डींग झालं. मी हळूच दादांना विचारलं - म्ह्टलं दादा ! एका ठिकाणी माझा आवाज फाटलाय ! आपण पुन्हा रेकॉर्ड करू या का ? ते म्हणाले - नको ! उलट मला या जागी हेच अपेक्षित होतं ! याचं कारण चित्रपटात हे दृष्य अशा वेळेला आहे की नायक अतिशय हताश मनःस्थितीत आहे. तो शास्त्रीय गायक आहे. पण या वेळेला अतिशय उदास आहे, जगण्याला कंटाळलेला आहे. अशा परिस्थितीत अगदी परफेक्ट गाणे अपेक्षित नाही. उलट मी सांगूनही कदाचित नेहमीच्या वेळेला तुला हा ईफेक्ट देता आला नसता जो तुझ्या या फाटलेल्या आवाजाने दिला आहे.

आरंभ


सर्वप्रथम माझ्या भावाचे म्हणजे विशालचे आभार ! या ब्लॉगची संपूर्ण मांडणी / सजावट विशाल कुलकर्णीने केली आहे.

आज दसर्‍याच्या मुहुर्तावर या ब्लॉगची सुरवात मी करतो आहे. या आधी मी वेगवेगळ्या ठिकाणी फुटकळ लेखन करत आलो. पण स्वतःचा ब्लॉग बनवावा असं काही मला वाटलं नव्हतं. अलीकडेच मंदारसारख्या काही मित्रांनी ही कल्पना माझ्या मनात ठसवली. अनेक गोष्टींकडे बघताना मनात जे विचार येतात त्याबद्दल कुठेतरी लिहून ठेवावं असं मला नेहमी वाटतं. ब्लॉग ही त्यासाठी योग्य जागा आहे. माझ्या मुख्य आवडीचे विषय जरी सिनेमा, नाटक, गाणी असले थिल्लर असले तरी या व्यतिरिक्तही अनेक विषयांबद्दल वाचताना त्या गोष्टींचे माझ्या मनातले रूप हे शब्दात व्यक्त करावे असं मला वाटायचं. या ब्लॉगच्या निमित्ताने ते पुर्ण होईल.


मायबोली तसेच फेसबूकवर केलेले काही लिखाण सुरवातीला ईथे मी पुनःप्रकाशित करतोय.


सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम

मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम
हमभी खडे हुवे है, गुनहगार की तरह
हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह
उठती है हर निगाह, खरी़दार की तरह

खरंतर असरार हुसेन खान उर्फ मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत लिहायचे ठरवले आणि पुर्णपणे ब्लँक झालो. असं मी खाजगीमधे बोलताना खुप बोलू शकेन पण ईंटरनेटवर त्यांच्याबद्दल ईतकी माहिती उपलब्ध आहे की त्यापेक्षा वेगळं आणखी काय लिहायचं हा मोठा प्रश्न होता. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अव्वल पाच गीतकारांपैकी मजरूह एक होते. पण ते गीतकार जास्त आणि कवी त्यामानाने कमी होते. उमेदीच्या काळात त्यांनी खरोखरच प्रचंड प्रमाणात उर्दु काव्यलेखन केलं होतं. पण त्यांचं शिक्षण हे सर्वसामान्य शाळा/कॉलेजात न होता मदरशांमध्ये झाल्याने अव्वल उर्दु मधील हे काव्य सर्वसामान्य रसिकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. हिंदी गीतलेखनाकडे ते केवळ आणि केवळ पोटासाठी वळले. तसा काही काळ त्यांनी हकीम म्हणूनही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. वर उधृत केलेली गझल ही त्यांच्या बेकारीच्या काळातली. जी नंतर मदन मोहन या जादूगाराने वापरून तिचं सोनं केलं. चित्रपटसृष्टीत येण्याच्या आधीची गझल असल्याने "मजरूह" या तखल्लूस चा वापर त्यात आहे. मजरूह चा ढोबळ अर्थ "जख़मी आत्मा".
मजरूह यांचा चित्रपटप्रवास सुरु झाला तो सैगल यांनी गायलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय (अजुनही) ठरलेल्या शहाजहान चित्रपटातील "गम़ दियें मुष्तकिल, कितना नाजूक है दिल ये ना जाना" या गाण्यापासून. या चित्रपटातली सैगलनी गायलेली सगळीच गाणी लोकप्रिय ठरली. त्यातली "गम़ दिये..." आणि "जब दिलही टूट गया" ही तुफान लोकप्रिय ठरली. तरी देखील मजरूह पुढील दोन वर्षे बेकार होते. खाण्या-पिण्याचे वांधे असलेल्या या काळात राज कपूर, नौशाद, मेहबूब खान या आणि अशाच काही मित्रांनी त्यांना आधार दिला. राज कपूरने त्यांचे "ईक दिन बिक जायेगा, माटी के मोल" हे गाणे माती-मोलाने नव्हे तर त्या काळातले चांगले १००० रुपये देऊन विकत घेतलं होतं. नंतर १९४९ मध्ये आलेल्या "अंदाज" ने त्यांचं जिवनच बदलून टाकलं. नौशाद यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाने उत्पन्नाचे नवे-नवे विक्रम केले. पण दुर्दैव परत एकदा आड आलं. हातात असलेले काही चित्रपट पुरेच होऊ शकले नाहीत. त्यातच साहीर, प्रदिप, भरत व्यास आणि शैलेंद्र यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेपुढे मजरूह यांचे अव्वल उर्दू काव्य झाकोळलं गेलं. पैकी साहीर आणि शैलेंद्र यांचं हिंदी बरोबरच उर्दूवरही तितकचं प्रभुत्व होतं. अशीच तब्बल तीन वर्षे गेली. आणि १९५३ मधे आला "फुटपाथ" - संगीत परत एकदा नौशाद. या ही चित्रपटातली सगळीच गाणी (शाम-ए-गम़ की कसम, सो जा मेरे प्यारे, सुहाना है ये मौसम) लोकप्रिय झाली. उर्दूबरोबरच हिंदी काव्यलेखनाचा मजरूह यांचा हा प्रयत्न लोकांना आवडला. आणि गीतकार म्हणून मजरूह यांनी जी सुरूवात केली ती अखेरच्या श्वासापर्यंत ते सातत्याने गीतलेखन करत होते. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९९१ हिंदी चित्रपटगीते मजरूह यांनी लिहीली. गीतसंख्येच्या बाबतीत फक्त आनंद बक्षी (१२५१ गीते) मजरूह यांच्यापुढे आहेत. तरीदेखील मी सुरूवातीस उल्लेख केल्याप्रमाणे साहीर, शैलेंद्र प्रभुतींप्रमाणे केवळ गाण्याच्या बोलांसाठी लक्षात रहातील अशी गाणी त्यांनी फार कमी लिहीली. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. पण त्यामागे संगीताचा वाटा मोठा होता. जवळजवळ सर्वच संगीतकारांबरोबर मजरूह यांनी काम केले. पण केवळ "दोस्ती" चित्रपटातील "चाहुंगा मै तुझे, सांजसवेरें" या एकाच गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. संगीतकाराने आधीच तयार केलेल्या चालींवर गीतलेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची आणखी काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -
  • सुन सुन सुन सुन जाली़मा - आरपार
  • बाबूजी धिरें चलना - आरपार
  • उधर तुम हसीं हो - मिस्टर अँड मिसेस ५५
  • चलीं गोरी पी के मिलन को - एक ही रास्ता
  • नज़र लागी राजा तोरे बंगले पे - काला पानी
  • तुम जो हुए मेरे हमसफर - १२ ओ क्लॉक
  • कोई आया धड़कन कहती है - लाजवंती
  • रातभर का है मेहमां अंधेरा - सोने की चिडीयाँ
  • यें रातें यें मौसम - दिल्ली का ठग
  • न तुम हमें जानो - बात एक रात की
  • जाग़ दिल-ए-दिवाना - ऊंचे लोग
  • उसको नहीं देखा हमने कभी - दादी माँ
  • आजा पिया, तोहे प्यार दूं - बहारोंके सपने
  • तेरे नैना तलाश करें - तलाश
  • आयों कहां से घनशाम - बुढा मिल गया
याशिवाय सी.आय्.डी., तुमसां नहीं देखा, पेईंग गेस्ट, सुजाता, चलती का नाम गाडी, चायना टाऊन, फिर वोही दिल लाया हुं, दोस्ती, मेरे सनम, तिसरी मंझील, ज्वेल थिफ, दस्तक, कारवाँ, अभिमान - हे असे काही चित्रपट आहेत ज्यातली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय झाली. एखाद्या गीतकाराची एका चित्रपटातली सर्व गाणी लोकप्रिय होण्याच्या बाबतीतला हा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत अबाधित आहे.

अशा या महान गीतकाराचा २४ मे रोजी १२ वा स्मृतीदिन होता. त्यानिमीत्त मजरूहजींना केलेला मानाचा मुजरा !
*****************************************************


(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

काव्यावळ

आंतरजालावरील  तमाम नव-कवी/कवयित्री, अमका-ग्रज, तमका-ग्रज, अमका-सूत, तमके-भूत ई.ई. सर्वांसाठी खुषखबर !

"सहनही होत नाही आणि लिहीताही येत नाही" - कारण अपूरे शब्दसंग्रह, कल्पना-दारिद्र्य ! काय आपण अशा दुखण्याने बेजार आहात. मग आपली वेदना आता आमच्यावर सोपवा आणि आपण बिनघोर झोपा. कारण "मागणी तसा पुरवठा" या तत्त्वावर आधारित "काव्यावळ" आता सुरु झाली आहे. या काव्यावळीची वैशिष्ट्ये, नियम आणि अटी खालीलप्रमाणे :
  • 'विषय' वगळता कुठल्याही विषयावर काव्य लिखाणाची हमी

  • कुठल्याही एका विषयावर एका तिमाहीत फक्त पाच कविता (त्यामुळे एकसुरी पणा टाळून योग्य संदेश पोचतो)

  • आपण निवडलेला विषय कशा प्रकारे सादर व्हावा याची ग्राहकाला पुर्ण मुभा ! उदा. गंभिर, विनोदी, पाचकळ, आर्त ई. ई.

  • एकदा निवडलेला विषय ऑर्डर नोंदवल्यानंतर बारा तासाच्या आत बदलण्याची सुविधा

  • आपल्या कवितेत आपला आवडता/आवडते शब्द वापराची सशुल्क सुविधा. (शब्दाप्रमाणे शुल्क आकारले जाईल)

  • कवितेचा मेहनताना आम्ही एकदाच आणि तोही ऑर्डर नोंदवण्यावेळी अ‍ॅडव्हान्स स्विकारतो.
अटी :
  • ग्राहक आणि विक्रेता (म्हणजे आम्ही) यांतील व्यवहार जरी पुर्णपणे अ-पारदर्शक असला तरी सदर व्यवहाराच्या गोपनियतेची हमी विक्रेता घेणार नाही. तशी हमी हवी असल्यास सशुल्क देण्यात येईल. उदा. एकदा आपले नाव आमच्या ग्राहकयादीत समाविष्ट झाल्यानंतर जर कधी आपणांस स्वतः काही लिहीण्याची आणि ते माबो वर प्रकाशित करण्याची (दुर्)बुद्धी झाली तर "सदरचे साहित्य आमच्या काव्यावळीतुनच विकत घेतले आहे" अशी टवाळी होऊ शकते.

  • आमच्याकडून विकत घेतलेल्या साहित्यावर "मेड टू ऑर्डर" आणि खाली "कविराज टवाळ" हे शब्द अपरिहार्य आहेत. जर आपणांस ते नको असतील किंवा त्याजागी कवी म्हणून आपले स्वतःचे नाव हवे असेल तर तशीही सुविधा सशुल्क उपलब्ध आहे. या सुविधेमध्ये आपल्या नावावर प्रकाशित झालेल्या कवितेच्या जाहिरातीसाठी पाच आय-ड्यांच्या वि.पू. मध्ये रिक्षा फिरवून आणण्याचे शुल्कही समाविष्ट आहे. तेव्हा या सुविधेचा लाभ जरूर घ्यावा.

  • कोणत्याही कवितेची फक्त तिन(च) कडवी लिहून मिळतील. त्याव्यतिरिक्त प्रत्येक कडव्याचा वेगळा आकार पडेल.

  • सदर "काव्यावळ" ही पुर्णपणे स्वायत्त असून ती कुठल्याही जन, गण आणि मन्-लोकपालाच्या कक्षेत येत नाही.

आणखीही काही सुविधा आणि अटी यांचा मसूदा तयार असून ग्राहकांच्या प्रतिसादाप्रमाणे तो योग्य वेळी जाहीर करण्यात येईल !

ग्राहकांचा संतोष हाच आमचा फायदा !

आपला नम्र,
टवाळ


(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

तु गेल्यावर........

ही  कविता खरंतर  २०१० मधली. पण आज माझ्या दिवंगत मित्राच्या स्मृती निमित्त माझ्या ब्लॉगवर वर टाकत आहे. यामध्ये काव्य वगैरे शोधण्याचा कुणी प्रयत्न करु नये. पण शेवटच्या चार ओळी मात्र शब्दश: खर्‍या आहेत. 

एक होता मित्र माझा नाव त्याचं डी.जे.
त्याच्या मनस्वी वक्तव्यांवर मारायचो मी पीजे
म्हणायचा - माझं आता एकच मिशन
घरा-घरांतल्या मना-मनात रुजवायचे आहेत "शंकर-जयकिशन"
हे असलं काही ऐकलं की वाटायचं - अरे हा तर नादखुळा
पण आज लक्षात येतयं
हत्ती जोखु पाहणार्‍या सात आंधळ्यातला मी तर एक आंधळा
फार नाही जेमतेम चारेकच वर्ष असतील झाली
पहील्या दुसर्‍या भेटीतच त्याने माझ्या गर्वाचं घर केलं खाली
म्हणायचा - मला संगणकाची एक कळ सुद्धा येत नाही दाबता
गरजच नव्हती त्याला त्याची,
कारण सरस्वतीचा त्याच्या जिभेवर होता राबता
दिवस-वर्ष कशी भराभर गेली
आणि एक दिवस ती बातमी आली
त्याच्या मुलीचा सुंदर मुखचंद्रमा त्या दिवशी काळवंडला
जेव्हा तिच्या समोरच तिचा बाबा बोलता-बोलता कलंडला
वहिनींनी केला आक्रोश, डॉक्टरांच्या फौजेस कामाला जुंपले
सर्वांचा मिळून एकच निष्कर्ष आला
डी.जे. च्या मृत्युचे एकमेव कारण "श्वासच संपले"
डी.जे. गेला, वाईट झालं, जनांमधे झाली थोडी हळहळ
आणि मग सुरु झाली नेहमीचीच धावपळ
तीच गाडी, तोच डबा, सारे काही तेच तेच
रोजच्या जगण्याभोवती परिस्थितीचे पेच तेच
तु जाऊन आता दिवस उलटले तीन शंभर
पण अजुनही मोबाईलमधे जपला आहे तुझा नंबर
तु गेल्याने फार काही नाही घडले
म्हणजे बघ एवढे दिवस उलटले
तरी एकही गाणे नाही गुणगुणले
ती धुळ खाणारी संवादिनी, तो गंजु पाहणार्‍या तारांचा तानपुरा
सगळे बघतात माझ्या कडे केविलवाणे
मित्रा, तु गेल्यावर असे हरवले सुर, हरवले गाणे !
-
(डी. जे. = दिपक जामखेडकर - मृत्यु - ७ ऑक्टोबर २००९)


(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)